पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक घेत शहरातील समस्या जाणून घेतल्या; गणेश चतुर्थी काळात पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना
देवगड,दि.२५ ऑगस्ट
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील नागरिक तसेच सणानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना पाणीटंचाई अथवा अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागू नये, यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे.
याच अनुषंगाने पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित सध्याच्या समस्या, पाणी वितरणातील अडचणी तसेच संभाव्य समस्या याबाबत कर्मचाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला.
गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील नागरिकांची संख्या वाढणार असून मोठ्या प्रमाणात चाकरमानी देवगड-जामसंडे येथे दाखल होणार आहेत. त्यामुळे या काळात पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
पाणीपुरवठा व्यवस्थेत कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास ती तातडीने दूर करावी, पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच गणेश चतुर्थीच्या कालावधीत पाणीपुरवठा यंत्रणा सतर्क ठेवावी, अशा सूचना तन्वी चांदोस्कर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.
गणेशोत्सव हा नागरिकांसाठी आनंदाचा सण असून या काळात पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी कोणालाही त्रास सहन करावा लागू नये, यासाठी पाणीपुरवठा विभागाने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
नगरपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याशी संबंधित संभाव्य अडचणींवर वेळीच उपाययोजना करून गणेशोत्सवाच्या काळात देवगड-जामसंडे शहरातील नागरिक तसेच चाकरमान्यांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.