वेंगुर्ला,दि.२८ ऑगस्ट
तालुक्यातील वेतोरे-वरचीवाडी येथे २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील हॉलमध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. राज गोविंद नाईक (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे वेतोरे गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत मृताचे काका दत्ताराम भिवा नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज नाईक हा आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. त्याचे वडील गोविंद नाईक शेती करतात, तर आई माधवी नाईक या कणकवली न्यायालयात नोकरीस आहेत. राज हा मुळदे येथील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी राजची आई नेहमीप्रमाणे कणकवली न्यायालयात गेली होती. सायंकाळी सुमारे ४ वाजता राजचे वडील गुरांसाठी चारा आणण्यासाठी रानात गेले होते. ते सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता घराचा मुख्य दरवाजा बंद होता. त्यामुळे ते मागील दरवाजाने घरात गेले.
घरातील हॉलमध्ये राज हा साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर शेजारील नागरिकांना बोलावण्यात आले. राज जिवंत असेल, या आशेने त्याला खाली उतरविण्यात आले; मात्र कोणतीही हालचाल दिसून न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत वेंगुर्ला पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आहे. वेतोरे येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते गोविंद उर्फ दीपक नाईक यांचा राज एकुलता एक मुलगा होता. तसेच राज अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्ये मागचे कारण अद्याप समजू शकले नाही.