आंबोली परिसरात आठ दिवसांपासून वीज खंडित; मोबाईल टॉवर ठप्प झाल्याने ओटीपीअभावी गॅस सिलेंडरचे वितरण रखडले

शेअर करा

ऑफलाईन पद्धतीने गॅस देण्याची प्रशासक सावित्री पालेकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी


​सावंतवाडी, दि. ९ जुलै


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागासह मुख्यत्वे आंबोली परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सततच्या वीज खंडिततेमुळे परिसरातील मोबाईल टॉवर बंद पडले असून नागरिकांचे मोबाईल देखील स्विच ऑफ झाले आहेत. या संपूर्ण दूरसंचार आणि वीज संकटामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यातच गॅस सिलेंडर वितरणाचा मोठा खोळंबा झाला आहे.
​आंबोली परिसरात गॅस सिलेंडर आणण्यासाठी ग्राहक गेले असता, गॅस एजन्सीकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे मोबाईलवर येणाऱ्या ओटीपी (OTP) ची मागणी केली जात आहे. मात्र, मोबाईल नेटवर्क आणि वीज नसल्यामुळे ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी येणे अशक्य झाले आहे. ओटीपी येत नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत गॅस एजन्सी चालकांनी गॅस सिलेंडर देण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे स्थानिक गृहिणी आणि ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. एका बाजूला पावसाचा जोर आणि दुसऱ्या बाजूला घरात गॅस नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
​या गंभीर समस्येची दखल घेत आंबोली गावच्या प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या संवेदनशील आणि गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सद्यस्थिती पाहता आंबोली परिसरासाठी ‘खास बाब’ म्हणून ऑनलाईनची अट शिथिल करून तातडीने ऑफलाईन पद्धतीने गॅस सिलेंडर वितरित करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला व गॅस एजन्सीला द्यावेत, अशी आग्रही मागणी सौ. पालेकर यांनी केली आहे. ग्रामीण भागातील बिघडलेली वीज यंत्रणा आणि ठप्प झालेली मोबाईल सेवा लक्षात घेता पालकमंत्र्यांनी यात तात्काळ हस्तक्षेप करावा, अशीच भावना आता संपूर्ण आंबोली परिसरातून व्यक्त होत आहे.

शेअर करा