देवगड : कोंडवाडा झाला, गुरांचा प्रश्न मात्र कायमच; देवगड-जामसंडेत मोकाट गुरांचा नागरिकांना त्रास

शेअर करा

पकडलेल्या गुरांचा लिलाव रखडल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; शहरात पुन्हा मोकाट गुरांचा वावर वाढला

देवगड,दि.२६ ऑगस्ट

देवगड-जामसंडे नगरपंचायत शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न गेल्या काही काळापासून ऐरणीवर आला होता. मोकाट गुरांमुळे अपघात होऊन काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याने या गंभीर प्रश्नाची पालकमंत्री नितेश राणे यांनी तत्काळ दखल घेत नगरपंचायतीच्या माध्यमातून कोंडवाड्याची निर्मिती केली. त्यानंतर मोकाट गुरांची पकड मोहीम राबवून काही गुरांना कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले.

मोकाट गुरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने पकडलेल्या गुरांना कोंडवाड्यात ठेवून नियमानुसार दहा दिवसांनंतर त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया निश्चित केली होती. मात्र, ठरलेल्या दिवशी गुरांच्या लिलावासाठी एकही व्यक्ती उपस्थित न राहिल्याने लिलावाची प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे पकडण्यात आलेल्या गुरांचा प्रश्नही अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शहरातील इतर मोकाट गुरांवरही प्रशासनाची प्रभावी कारवाई होणे अपेक्षित असताना देवगड-जामसंडे शहरातील विविध भागांमध्ये अद्याप मोठ्या संख्येने मोकाट गुरे फिरताना दिसत आहेत. रस्त्यांवर तसेच बाजारपेठ आणि रहदारीच्या ठिकाणी गुरांचा वावर असल्याने वाहनचालक, पादचारी तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या गुरांमुळे अपघाताचा धोका कायम आहे.

कोंडवाड्याची निर्मिती करून मोकाट गुरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलले असले तरी प्रत्यक्षात शहरातील मोकाट गुरांची संख्या कमी झालेली दिसत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पकडलेल्या गुरांचा लिलाव झालेला नाही, तर शहरातील उर्वरित मोकाट गुरांवरही सातत्याने कारवाई होताना दिसत नसल्याने प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

आता प्रशासन मोकाट गुरांची पकड मोहीम पुन्हा व्यापक स्वरूपात राबवणार का? तसेच कोंडवाड्यातील गुरांच्या लिलावाबाबत पुढील कार्यवाही कधी होणार? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून मोकाट गुरांचा प्रश्न केवळ कोंडवाडा उभारण्यापुरता मर्यादित न ठेवता त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

देवगड-जामसंडे शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नगरपंचायतीने खालील पावले उचलणे गरजेचे आहे:
​गुरांचे टॅगिंग: शहरातील सर्व मोकाट गुरांचे प्राधान्याने टॅगिंग करावे, जेणेकरून त्यांच्या मालकांची ओळख पटवणे प्रशासनाला सोपे होईल.
​कोंडवाडा व्यवस्थापन: टॅगिंग नसल्यास पकडलेल्या गुरांवर मालकी हक्क सांगायला कोणीही पुढे येणार नाही; त्यामुळे टॅगिंग प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.
​कठोर कारवाई व दंड: जाणीवपूर्वक गुरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी.
​प्रभावी यंत्रणा व कठोर नियमांची अंमलबजावणी करूनच हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो.

शेअर करा