वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय : अर्चना बंगे
कुडाळ ,दि.२९जुलै
हुमरमळा-वालावल बिजोळेवाडी रस्त्यावर पुलाला भगदाड पडल्याने वाहतूक बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने पाहणी करावी अशी मागणी वालावल पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांनी केली आहे.
हुमरमळा-वालावल बिजोळेवाडी ते करमळीवाडी गावधडवाडी ते आरकाचे पूल वालावल असा रस्ता आहे. परंतु, बिजोळेवाडी पूल बांधून बरीच वर्षे झाली. आता या पुलाला मोठे खड्डे पडले असून सर्व पाईप फुटले आहेत, असे सांगून बंगे म्हणाल्या की, सध्या ग्रामस्थांना जाण्या-येण्याची कसरत करावी लागते. तसेच वाहने जात नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. या कामाची त्वरित पहाणी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिका-यांनी करुन त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी बंगे यांनी केली आहे.