कुणकवळे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प संपन्न
मालवण,दि. १६ ऑगस्ट
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही भारताची घटनात्मक रचना करण्यात निर्णायक योगदान दिले.त्यामुळे स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची पायाभरणी करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे प्रतिपादन बार्टीचे समतादूत आणि भारतीय बोद्ध महासभा प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष संग्राम कासले यांनी कुणकवळे येथे आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प गुंफताना केले
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2026 चे चौथे पुष्प गाव शाखा कुणकवळे या ठिकाणी गुंफण्यात आले. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस नचिकेत पवार, तालुका कार्यालयीन सचिव शंकर कदम, संरक्षण उपाध्यक्ष योगेश वराडकर,संस्कार सचिव मिलिंद पवार, सचिन कासले, प्रचार व पर्यटन सचिव संदीप कदम,तालुका महिला संघटक सानिका कदम, कुणकवळे गावशाखा उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, महिला शाखा गाव शाखा अध्यक्ष निशा कदम, कोषाध्यक्ष सायली कदम, सचिव संघमित्रा कदम, गौतम कदम, हेमंत कदम तसेच गाव शाखा पदाधिकारी,उपासक,उपासिका उपस्थित होते.
यावेळी नचिकेत पवार, योगेश वराडकर यांनी कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्या तर तालुकाध्यक्ष आद. रविकांत कदम यांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना संग्राम कासले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नव्हते. अस्पृश्यता, जातिभेद आणि सामाजिक विषमता नष्ट होऊन सर्व भारतीयांना समान अधिकार मिळणे आवश्यक होते. त्यांनी शोषित आणि वंचित समाजाला शिक्षण, प्रतिनिधित्व, रोजगार आणि राजकीय अधिकार मिळावेत यासाठी सातत्याने संघर्ष केला. बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्या आर्थिक व प्रशासकीय धोरणांवर टीका केली. त्यांनी भारतीयांच्या हिताचा विचार करून शासनव्यवस्थेत मूलभूत सुधारणा करण्याची मागणी केली. सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी त्यांनी कायदा, संविधान आणि लोकशाही संस्थांचा मार्ग स्वीकारला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार विभाग सचिव सचिन कासले तर आभार संस्कार सचिव मिलिंद पवार यांनी केले.गाव शाखेच्या वतीने संदीप कदम यांनी आभार व्यक्त केले.