मालवण : आंबेडकरी चळवळीचा इतिहासात रमाईंचे स्थान महत्त्वपूर्ण – संग्राम कासले

शेअर करा

वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प गोळवण येथे संपन्न

मालवण,दि.३१ ऑगस्ट

रमाई आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसार सांभाळत बाबासाहेबांच्या जीवनाला खंबीर साथ दिली. माता रमाईंचे जीवन म्हणजे संघर्षातून उभा राहिलेल्या एका महान स्त्रीची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या त्यागामुळे आणि बाबासाहेबांना दिलेल्या साथीमुळे आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात रमाईंचे स्थान महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन बार्टीचे समतादूत आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका प्रचार पर्यटन उपाध्यक्ष संग्राम कासले यांनी गोळवण येथे धम्म प्रवचन मालिकेच्या निमित्ताने बोलताना केले.

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा व संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ मधील आठवे पुष्प गाव शाखा गोळवण येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप व धूप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण केले. गाव शाखेच्या वतीने मोहन पवार यांनी उपस्थित तालुका शाखेच्या सर्व पदाधिकारी व मान्यवरांचे स्वागत केले.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, जिल्हा संस्कार उपाध्यक्षा नेहा पेंडुरकर, तालुका अध्यक्ष रविकांत कदम तालुका सरचिटणीस नचिकेत पवार,तालुका कोषाध्यक्ष प्रकाश पवार,तालुका संस्कार उपाध्यक्ष सुर्यकांत कदम तालुका संस्कार सचिव मिलिंद पवार, तालुका संस्कार सचिव सचिन कासले, तालुका प्रचार पर्यटन सचिव संदीप कदम वडाचापाटचे कोषाध्यक्ष तुषण कासले , तसेच गाव शाखा मसदे अध्यक्ष तानाजी कदम, कोषाध्यक्ष प्रशांत मसदेकर, साळेलचे प्रशांत जाधव, गाव शाखा गोळवण उपाध्यक्ष अरविंद पवार, सचिव मोहन पवार यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते.

यावेळी संजय पेंडुरकर , रविकांत कदम, सूर्यकांत कदम यांनी कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार विभाग सचिव सचिन कासले यांनी केले. तालुका कोषाध्यक्ष प्रकाश पवार यांनी आभार मानले, तर गाव शाखेच्या वतीने मोहन पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा