सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गाबाबत दाभिलमध्ये पहिलीच सुनावणी; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

शेअर करा

सावंतवाडी,दि.२१ ऑगस्ट
महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी (पवनार ते पत्रादेवी) भू-संपादनाबाबत दाभिल येथे झालेली पहिलीच सुनावणी वादाची ठरली. या सुनावणीत दाभिल ग्रामस्थांनी महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत, आधी प्रकल्पाची परिपूर्ण माहिती द्या, मगच सुनावणी घ्या, अशी आक्रमक भूमिका घेतली. यासंदर्भातील संयुक्त निवेदन उपविभागीय अधिकारी तथा भू-संपादन अधिकारी वीरसिंग वसावे यांना देण्यात आले. जिल्ह्यातील १४ गावांमधून हा महामार्ग जात असून, पहिल्याच सुनावणीत झालेल्या या विरोधामुळे इतर गावांमध्येही आंदोलनाची धार तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत.
​१९ जून रोजी या राज्य महामार्गाच्या भू-संपादनासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. यावर दाभिलसह १४ गावांतील ग्रामस्थांनी लेखी हरकती नोंदवल्या होत्या. या हरकतींवर म्हणणे मांडण्यासाठी महसूल प्रशासनाने दाभिल गावात पहिली सुनावणी आयोजित केली होती. त्या दृष्टीने ग्रामस्थ ७/१२ उतारा, ८-अ, फेरफार, खरेदीखत व नकाशा यांसारख्या कायदेशीर कागदपत्रांसह उपस्थित राहिले होते.
​सुनावणीदरम्यान उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, भूमिअभिलेख अधीक्षक श्री. विनायक ठाकरे व नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर यांनी स्पष्ट केले की, प्रत्यक्ष मोजणी आणि अंतिम सर्व्हे झाल्याशिवाय महामार्ग नेमका कोणत्या जागेवरून जाणार हे निश्चित सांगता येणार नाही. सर्व्हेचे काम असलेल्या ‘मोनार्च’ कंपनीच्या प्रतिनिधी साईराज यांनी लॅपटॉपवर महामार्गाची प्राथमिक रचना दाखवण्याचा प्रयत्न केला.
​मात्र, ग्रामस्थांच्या वतीने शशिकांत गवस, अनिल गवस, भिकाजी घाडी, विष्णू घाडी, शशिकांत घाडी व शंकर निकम यांनी प्रशासकीय घाईवर ताशेरे ओढले. महामार्गाची रचना, विस्तार, बांधकामाचे स्वरूप, बोगदे, पूल, रस्त्याचे पदर आणि यामुळे स्थानिक देवस्थानांना होणारा फटका या सर्व बाबींची आधी स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अतिघाईने प्रक्रिया उरकून महामार्ग ग्रामस्थांच्या माथी मारू नये, असे सांगत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.
​या सुनावणीस महसूल सहाय्यक पंकज मांजरेकर, तलाठी विजय कविटकर, ग्रामसेवक प्रफुल्ल धुरी, कोतवाल अशोक गावडे यांच्यासह दाजी घाडी, कृष्णा घाडी, राजश्री राऊळ, सखाराम जाधव, बाबली राऊळ, विष्णू राऊळ, रमेश राऊळ, विद्याधर घाडी, भगवान राणे, अनिकेत जाधव, शिवप्रसाद देसाई आणि ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गवस यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा