सावंतवाडी,दि.०५ जुन
कोकणात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या कामांना वेग द्यावा, असा अंदाज ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे केंद्रामार्फत वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाच्या पुढील चार आठवड्यांच्या विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ERFS) हा कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे.
हवामान अंदाजानुसार, ४ ते ११ जून या पहिल्या आठवड्यात संपूर्ण कोकणात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. यामध्ये उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३ ते ७ टक्के कमी, ठाणे व रायगड जिल्ह्यात ७ ते १० टक्के कमी, तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा १० ते १५ टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे
.
मात्र, ११ ते १८ जून या दुसऱ्या आठवड्यात पावसाची स्थिती सुधारेल. या काळात पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पाऊस सरासरीएवढा राहील. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा १ ते ३ टक्के जास्त असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्याचा अंदाज हवामान विभागाकडून नंतर अद्ययावत केला जाईल.
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ठिकाणी सिंचनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध असतील, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी भाताच्या हळव्या (लवकर येणाऱ्या) जातींच्या पेरणीची कामे सुरू करावीत. तसेच, दुसऱ्या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता लक्षात घेता, आजूबाजूची पर्जन्यपरिस्थिती आणि स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन भात पिकाच्या धुळवाफ पेरणीची कामे करण्यास हरकत नाही, असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांच्या वतीने देण्यात आला आहे.