सावंतवाडी : भारतीय युद्धातील शूरवीरांचा विशाल परब यांच्याकडून गौरव

शेअर करा

सावंतवाडी,दि.११ ऑगस्ट
‘हर घर तिरंगा’ अभियान आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी भारत-चीन (१९६२) व भारत-पाक (१९६५) युद्धातील शूर सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान केला.
​या अभियानांतर्गत १० ते १३ ऑगस्ट दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवण्यात आले. याचाच एक भाग म्हणून विशाल परब आणि अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी सैनिकी परंपरा लाभलेल्या कलंबिस्त गावाला भेट दिली. या वेळी दोन्ही युद्धांमध्ये थेट सहभाग घेतलेले शूरवीर माजी सैनिक विठ्ठल बाबाजी सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यात आले.
​कलंबिस्त हे गाव घरटी सैनिकी गाथा सांगणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात दोन्ही युद्धांमध्ये विजय मिळवून देणारे पाच ते सात शूर सैनिक आहेत. माजी सैनिक विठ्ठल सावंत यांच्याशी संवाद साधताना, युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या धीराच्या आणि प्रेरणेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी दोन्ही युद्धांतील शूर योद्ध्यांना एकत्र आणून कलंबिस्त गावातच त्यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित केला जाईल, असे आश्वासन विशाल परब यांनी दिले.
​या प्रसंगी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माजी सैनिक बाबुराव कविटकर, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, भाजप आंबोली मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विनेश तावडे, प्रवीण सावंत, निखिल बिडये, रामचंद्र सावंत आणि सिद्धी सावंत यांच्यासह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा