सिंधुदुर्गातील गावांनी इको-सेंसिटिव्ह झोनबाबत गैरसमजांना बळी पडू नये : सागर नाणोसकर

शेअर करा

सावंतवाडी,दि.१५ ऑगस्ट

जिल्ह्यातील गावांचा इको-सेंसिटिव्ह झोनमध्ये समावेश करण्याच्या मुद्द्यावर सध्या विविध चर्चा सुरू आहेत. या विषयाबाबत “इको-सेंसिटिव्ह झोन झाल्यानंतर वृक्षतोड करता येणार नाही, विकासकामे करता येणार नाहीत, बांधकाम करता येणार नाही” अशा प्रकारची भीती निर्माण करणारी माहिती ही लोकांची दिशाभूल करणारी असल्याचे मत नाणोस ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी येथे झालेल्या आमसभेत आमदार दीपक केसरकर यांनी “इको-सेंसिटिव्ह झोन नको असेल तर तसा ठराव करा” असे मत व्यक्त केले. मात्र, सिंधुदुर्गातील गावांनी या विषयाकडे केवळ भीतीच्या दृष्टीने न पाहता त्याचा दीर्घकालीन पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम समजून घेणे गरजेचे असल्याचे नाणोसकर यांनी सांगितले.

“इको-सेंसिटिव्ह झोन म्हणजे गावांचा विकास थांबविणे नव्हे. उलट जल, जमीन आणि जंगलाचे संरक्षण करताना शाश्वत विकासाची दिशा निश्चित करण्याची संधी आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे मोठे किंवा विनाशकारी प्रकल्प भविष्यात गावांच्या माथी मारले जाऊ नयेत, यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण महत्त्वाचे आहे,” असे सागर नाणोसकर यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख ही निसर्ग, शेती, समुद्रकिनारा, जंगल, नद्या, डोंगर आणि समृद्ध जैवविविधता यामुळे आहे. या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन झाले तरच पर्यटन, शेती, स्थानिक रोजगार आणि ग्रामविकास दीर्घकाळ टिकू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

त्यामुळे इको-सेंसिटिव्ह झोनबाबत गैरसमज किंवा भीती पसरविण्याऐवजी नेमके नियम काय आहेत, त्याचा गावांना काय फायदा होऊ शकतो आणि कोणत्या बाबींवर नियंत्रण येते, याची वस्तुनिष्ठ माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

“आजचा निर्णय हा केवळ एका गावाचा प्रश्न नसून सिंधुदुर्गाच्या पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जल, जमीन आणि जंगल शाबूत ठेवायचे असेल तर सिंधुदुर्गातील गावांनी इको-सेंसिटिव्ह झोनच्या विषयाकडे सकारात्मक आणि दूरदृष्टीने पाहणे गरजेचे आहे,” असे ठाम मत सागर नाणोसकर यांनी व्यक्त केले.

शेअर करा