नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग,दि.२७ ऑगस्ट
देवघर धरणाची कमाल पाणी पातळी १८७.५० मीटर असून सद्यस्थितीत धरणातील पाणीपातळी १८५.७० मीटरपर्यंत पोहोचली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत मंजूर पाणीपातळी व विसर्गाचे नियमन करण्याचे वेळापत्रक (ROS) नुसार धरणातील पाणीपातळी १८५.६५ मीटरपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता दि. २८ ऑगस्ट २०२६ पासून सकाळी ७ वाजल्यापासून वीज निर्मितीसाठी ६.० क्युमेक्स विसर्गाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातील पाणी नदीपात्रात येऊन नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन दि. २८ ऑगस्टपासून पुढील कालावधीत नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढू शकतो, हे लक्षात घेऊन जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल-कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.