वेंगुर्ला नं.१ मध्ये अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन

शेअर करा

वेंगुर्ला,दि. १८ ऑगस्ट(प्रथमेश गुरव)

वेंगुर्ला शाळा नं. १ मध्ये उभारण्यात आलेल्या अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते आज १८ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. ही संगणक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. अशा सुविधा निर्माण झाल्यानंतर त्यांची योग्य देखभाल आणि सातत्याने वापर होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त उपयोग करून द्यावा, असे आवाहन श्री.कामत यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गामध्ये चार प्रयोगशाळा मंजूर झाल्या. त्यापैकी एक प्रयोगशाळा ही वेंगुर्ला शाळा नं. १ मध्ये उभारली आहे. या प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्ष दिलीप गिरप, पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, नगरसेविका ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, नूतन गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, भाजप वेंगुर्ला तालुका अध्यक्ष पप्पू परब, भेडशीचे युवा उद्योजक दत्तात्रय उर्फ बाबा टोपले, नगरसेवक प्रणव वायंगणकर, वसंत तांडेल, केंद्रप्रमुख विश्वनाथ जगताप, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद कामत म्हणाले की, प्राथमिक शाळांकडे यावर्षी विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत आहे, ही समाधानाची बाब आहे. शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. पालकांनी केवळ बाह्य आकर्षणाला भुलून आपल्या पाल्यांना दूरच्या शाळांमध्ये पाठविण्यापेक्षा स्थानिक शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
या शाळेला सुमारे १८० वर्षांची परंपरा असून रामेश्वर मंदिर परिसरातील या शाळेला विशेष महत्त्व आहे. बॅ. नाथ पै यांनी याच शाळेत शिक्षण घेतले असल्याने शाळेचा गौरव मोठा आहे. अशा ऐतिहासिक शाळेत डिजिटल संगणक प्रयोगशाळा सुरू होणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून, अशा उपक्रमांची योग्य देखभाल व निगा राखणे ही शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रितेश राऊळ यांनी केले.
कार्यक्रमाच्या योग्य आयोजनाबद्दल त्यांनी व्यवस्थापन समिती व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी तर मान्यवरांचे स्वागत व आभार अभिषेक वेंगुर्लेकर यांनी मानले.

शेअर करा