- डॉ. सोमनाथ कदम
मालवण ,दि.२७ जून
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार हाती घेतल्यानंतर अवघ्या बारा दिवसांत जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या आधुनिक लोकशाही मूल्यांचा स्पष्ट पुरस्कार करण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने ज्या मानवतावादी मूल्यांची हमी दिली, त्यांची बीजे शाहू महाराजांच्या राज्यकारभारात आणि त्यांच्या जाहीरनाम्यात आढळून येतात. रयतेला केंद्रस्थानी ठेवून शासनव्यवस्था उभारणारा आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणारा असा जाहीरनामा प्रसिद्ध करणारे राजर्षी शाहू महाराज हे भारतीय इतिहासातील अद्वितीय लोकराजे होते, असे प्रतिपादन कणकवली महाविद्यालय, कणकवली येथील इतिहास विभागप्रमुख, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व लेखक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले.
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, मालवण यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नागेश कदम होते. यावेळी मंचावर फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक तथा माजी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, मालवण नगरपालिकेचे आरोग्य सभापती सिद्धार्थ जाधव, स. का. पाटील सिंधुदुर्ग मालवण महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, माजी तहसीलदार आनंद मालवणकर, प्रा. डॉ. दत्ता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कदम यांनी आपल्या व्याख्यानात राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदर्शी आणि लोकाभिमुख धोरणांचा सविस्तर आढावा घेतला. मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडाच्या संक्रमणकाळात भारतात सुमारे ५६५ संस्थाने अस्तित्वात होती. तथापि, त्यांपैकी आधुनिक लोकशाही मूल्यांवर आधारित आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारा राज्यकारभार करणारे महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थान हे एकमेवाद्वितीय ठरते, असे त्यांनी नमूद केले.
राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, युवक, महिला, बहिष्कृत समाज, आदिवासी, भटके-विमुक्त जाती-जमाती तसेच समाजातील सर्व वंचित, दुर्लक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणि धोरणे राबविली. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक न्याय, आरक्षणाची अंमलबजावणी, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि सामाजिक समतेसाठीचे त्यांचे प्रयत्न हे भारतीय सामाजिक इतिहासातील मैलाचे दगड ठरले आहेत, असे त्यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराजांनी अंधश्रद्धा, दैववाद आणि रूढीवादी विचारांना नाकारून विज्ञाननिष्ठ आणि विवेकाधिष्ठित शासनपद्धतीचा अवलंब केला. धर्मसत्तेचा राज्यकारभारावर होणारा अनावश्यक आणि अवाजवी हस्तक्षेप रोखण्यात ते यशस्वी ठरले. परिणामी आधुनिक कल्याणकारी राज्याची संकल्पना कोल्हापूर संस्थानात प्रत्यक्षात साकार झाली, असे डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कल्याणकारी स्वराज्याचा पाया रचला आणि जनतेच्या हितासाठी आज्ञापत्रांच्या माध्यमातून प्रशासनाला दिशा दिली, त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत राजर्षी शाहू महाराजांनी “बहुजन सुखाय, बहुजन हिताय” या तत्त्वावर आधारित राज्यकारभार केला. शिक्षण, उद्योग, शेती, सामाजिक न्याय आणि प्रशासन या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी विकासाचा भक्कम पाया घातला. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कृतिशील आणि लोकाभिमुख वारसदार म्हणून राजर्षी शाहू महाराज इतिहासात अजरामर झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्ये राजर्षी शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचा मूलाधार होती. याच कारणामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांना भारतीय सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ मानले होते. सामाजिक परिवर्तन, लोकशाही मूल्यांची जोपासना आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेले त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असून समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी ते मार्गदर्शक ठरते, असे मत डॉ. सोमनाथ कदम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मीनाक्षी कांबळे यांनी केले. या व्याख्यानासाठी मालवण शहर व परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.