मालवण: गुरू जीवनाचा दीपस्तंभ ; विद्यार्थ्यांनी विनय व विवेकाने घडावे –प्राचार्य कैलास राबते

शेअर करा

मालवण,दि.०१ ऑगस्ट

“मानवी जीवनात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिष्याच्या जीवनाला योग्य आकार देण्याचे कार्य गुरू करीत असतो. विद्यार्थी तीन प्रकारचे असतात, मिरवणारे, गिरवणारे आणि घडविणारे. विद्यार्थ्यांनी स्वतः घडतानाच इतरांनाही घडविण्याचा प्रयत्न करावा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विनय, विवेकबुद्धी आणि योग्य दिशेने वाटचाल आवश्यक आहे,” असे प्रतिपादन स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी येथे बोलताना केले

मालवण येथील भंडारी ए सो हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक आरडी बनसोडे, शिक्षक संदीप अवसरे, शिक्षिका सौ संजना सारंग, सौ अस्मिता वाईरकर, सौ सरोज बांदेकर, पालक महेश परब सौ मानसी परब अमित मयेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते यावेळी व्यासमुनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले मुख्याध्यापक श्री बनसोडे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले

यावेळी प्रा राबते यांनी गुरू हा केवळ शिक्षण देणारा नसून जीवनाचा अर्थ समजावून सांगणारा दीपस्तंभ असतो. आपल्या शिष्याने मोठे व्हावे, प्रगती करावी हीच प्रत्येक गुरूची भावना असते. त्यामुळे शिक्षकांनी दाखविलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा असे सांगत त्यांनी गुरूचे मानवी जीवनातील स्थानही प्रभावीपणे विषद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या महत्त्वावर समयोचित भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मय परब यांनी केले, तर कुमारी उर्विका मालंडकर हिने आभार प्रदर्शन केले.

शेअर करा