मालवण ,दि.२१ जुलै
नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना येत असलेल्या वाढीव वीजबिलाच्या समस्येबाबत तसेच अन्य वीज समस्या बाबत युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम सुधीर साळसकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी यांनी मालवण वीज वितरण कार्यालय येथे वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. वीज ग्राहकांच्या प्रश्नांची तातडीने गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, उपविधानसभा प्रमुख संकेत राऊळ, जिल्हा सचिव राहुल बागवे, मालवण तालुकाप्रमुख अभी लाड, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, निकीत वराडकर, मालवण तालुका सचिव तथागत मालवणकर, योगेश कामतेकर, आचरा विभाग प्रमुख उमेश सावंत, अमोल मुळीक, मंगेश साळसकर, संदीप राणे, शाम घाडी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन स्मार्ट वीजमीटर बसवण्यात आल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. अनेक ग्राहकांचा वीज वापर पूर्वीइतकाच असूनही त्यांच्या वीज बिलामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम, आर्थिक असह्य आणि असंतोष निर्माण झाला आहे, असे यावेळी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच मालवण शहर परिसर व किनारपट्टी भागात प्रामुख्याने अनेक वीज खांब, वीज तारा व वीज साहित्य जीर्ण झाले आहे. काही ठिकाणी तारा तुटून पडतात. तरी याचा सर्वे होऊन आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून इन्सुलेटेड वीज वायर बसवण्यात याव्यात अशीही मागणी यावेळी युवा सेना पदाधिकारी यांनी केली. अन्य वीज समस्या बाबत वीज अधिकारी यांचे लक्ष वेधुन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. विविध विषयावर झालेल्या या चर्चेत वीज वितरणचे अधिकारी उपकार्यकारी अभियंता सचिन मेहत्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.