सावंतवाडी दि.२ ऑगस्ट
पावसाळ्यात पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या आंबोली येथील मुख्य धबधब्यावर वनविभागाने लावलेला एक बॅनर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरवरील एका भयंकर भाषिक चुकीमुळे “प्रवेश शुल्क” ऐवजी चक्क “उपद्रव शुल्क” असा शब्द छापला गेल्याने पर्यटकांमध्ये हास्याची लाट पसरली आहे, तर दुसरीकडे शासकीय निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बॅनरवर नक्की काय छापले आहे?
वनविभाग सावंतवाडी आणि वनपरिक्षेत्र आंबोली यांच्या नावाने लावण्यात आलेल्या या बॅनरवर मोठ्या अक्षरांमध्ये पुढीलप्रमाणे मजकूर आहे:
”धबधबा पर्यटन”
”उपद्रव शुल्क – Ticket only Rs. 20/-“
विशेष म्हणजे या बॅनरवर ५ ऑक्टोबर २०११ च्या शासन निर्णयाचा आणि क्रमांकाचाही अधिकृत उल्लेख करण्यात आला आहे.
पर्यटक संभ्रमात; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
’उपद्रव’ म्हणजे त्रास, गोंधळ किंवा हुल्लडबाजी (Nuisance). त्यामुळे हा बॅनर वाचून धबधब्यावर येणारे पर्यटक गमतीने एकच प्रश्न विचारत आहेत—”आता धबधब्यावर नक्की क कसला उपद्रव करायचा? आणि तो करण्यासाठी २० रुपये का द्यायचे?”
इंग्रजीत “Ticket only Rs. 20/-” असा उल्लेख असल्याने वनविभागाला केवळ ‘प्रवेश शुल्क’ (Entry Fee) आकारायचे आहे हे स्पष्ट होते. टायपिंग करताना किंवा प्रिंटिंग दरम्यान “प्रवेश” ऐवजी “उपद्रव” असा शब्द टाईप झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
स्थानिकांची नाराजी; तातडीने दुरुस्तीची मागणी
सध्या आंबोलीत पर्यटन हंगाम ऐन भरात असून आज रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या निसर्गरम्य परिसराला भेट देतात. अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळी वनविभागासारख्या जबाबदार यंत्रणेकडून अशा प्रकारच्या अक्षम्य चुका होणे हे शासकीय कामाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी २० रुपये द्यायचे आहेत, उपद्रव करण्यासाठी नाही! सरकारने पर्यटनाला चालना देताना अशा लहान वाटणाऱ्या पण हसू करून घेणाऱ्या चुका टाळल्या पाहिजेत आणि वनविभागाने तातडीने हा बॅनर बदलून दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.