सावंतवाडी | १६ जून
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ या गावांमधील शेतकऱ्यांना ‘शेतकरी कर्जमुक्त योजना २०२६’ चा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी मंगळवारी मंत्रालयात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या तीन गावांमधील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजनेतील ‘फार्मर आयडी’ची (Farmer ID) अट शिथिल करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार केसरकर यांनी यावेळी केली. यावर महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक आयोजित करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
७/१२ नसल्याने ९० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, गेळे व चौकूळ या गावातील शेतकरी ‘कबूलायतदार गावकर’ जमिनीवर म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर गेली कित्येक वर्षे पारंपारिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र, तांत्रिक कारणांमुळे या गावातील शेतकऱ्यांच्या वैयक्तिक नावे अजूनही ७/१२ (सातबारा) नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या जमिनींचे सातबारा त्यांच्या नावे करण्याची प्रक्रिया शासनामार्फत सुरू आहे.
परंतु, सध्याच्या कर्जमुक्ती धोरणामध्ये ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या नावे जमिनीचा ७/१२ नसल्याने त्यांना सद्यस्थितीत फार्मर आयडी मिळणे शक्य नाही. परिणामी, शासनाने ही अट कायम ठेवल्यास या गावांमधील सुमारे ९० टक्के शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार असून ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील, अशी भीती आमदार केसरकर यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
जिल्हा बँकेने दिले होते कर्ज, अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत:
विशेष म्हणजे, जमिनीची मालकी अधिकृतपणे नावे नसली तरी गेली कित्येक वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणि विविध कार्यकारी सोसायट्यांद्वारे या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आलेले आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी आधीच आर्थिक डबघाईला आला आहे. अशा कठीण परिस्थितीत त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
महसूल मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन
आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रालयातील दालनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन या गंभीर समस्येवर सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, महसूल मंत्र्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधितांची एक विशेष बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर उपस्थित होते. या मागणीमुळे आंबोली परिसरातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.