सावंतवाडी-दोडामार्गात वीज आणि रस्त्यांचा खेळखंडोबा

शेअर करा

आढावा बैठकीत आमदार दीपक केसरकरांनी अधिकाऱ्यांना झापले

​सावंतवाडी, दि. ७ जुलै
गेल्या अनेक दिवसांपासून सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या वीज खंडिततेच्या समस्येमुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. “लोकांच्या भावना तीव्र असून ८-८ दिवस वीज का नाही याचे नेमके कारण सांगा आणि वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करा,” असे कडक निर्देश आमदार दीपक केसरकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित वीज आणि रस्ता कामांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला.


​या बैठकीला नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, प्रभारी प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
​स्मार्ट मीटर सक्ती आणि वाढीव बिलांवरून संताप:


​बैठकीत नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीबाबत तीव्र उद्रेक व्यक्त केला. मंगेश तळवणेकर आणि नंदन वेंगुर्लेकर यांनी लक्ष वेधले की, कोणतीही परवानगी न घेता जबरदस्तीने ३० हजारांहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे बिलांचे प्रमाण भरमसाठ वाढले आहे. वाफोली ग्रामपंचायतीचे वीज बिल जे आधी १३ हजार यायचे, ते आता थेट ३५ हजारांवर पोहोचले आहे. मतदारसंघात तब्बल ४२ हजार ‘फॉल्टी मीटर’ असून ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, महालक्ष्मी पॉवर कंपनीत तयार होणारी वीज गोवा व कर्नाटकला दिली जाते, त्यातील १० मेगावॅट वीज स्थानिक जनतेला मिळाली पाहिजे, अशी मागणी नंदन वेंगुर्लेकर यांनी केली.
​दोडामार्ग १४ दिवस अंधारात; वन विभागाच्या जाचक अटी:


​दोडामार्गचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी संताप व्यक्त

करताना सांगितले की, तालुक्यात तब्बल १४ दिवस वीज नाही. ‘इको सेन्सिटिव्ह झोन’च्या नावाखाली वीज वाहिन्यांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्यास वन विभागाकडून महावितरणला दंड ठोठावला जातो. त्यामुळे कर्मचारी काम करण्यास धजावत नाहीत. यावर श्री.गवस यांनी, “एकीकडे जंगलतोड होत असताना तिकडे दुर्लक्ष होते, मात्र लोकांच्या विजेसाठी फांद्या तोडल्या तर दंड का?” असा सवाल उपस्थित केला. आंबोली, चौकुळ आणि गेळे यांसारख्या प्रमुख पर्यटन स्थळांवरही वीज नसल्याने पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी सांगितले.
​रस्त्यांची दुरवस्था आणि अपघातांचे सत्र:
​सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर व चंद्रकांत जाधव यांनी वस्तुस्थिती मांडली. सुधा कवठणकर यांनी सांगितले की, सातार्डा येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून, तिथून गाड्या गेल्यास चिखल थेट शाळकरी मुलांच्या कपड्यांवर उडतो. महेश खानोलकर यांनी मळगाव घाटातील तुटलेल्या रेलिंगमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधले. तर चराठे रस्त्यावर आणि उपरल डेपो पुढे धोकादायक बनलेली झाडे उन्मळून पडण्याची भीती मंगेश तळवणेकर यांनी व्यक्त केली.
​अधिकाऱ्यांना तंबी आणि दोन दिवसांची मुदत:
​बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता अभिमन्यू राख आणि अधिकारी उशिरा आल्याने आमदार केसरकर यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. “सावंतवाडीला दोन फिडर असताना विजेचा खेळखंडोबा का? दोडामार्ग आणि आंबोली सारखी ठिकाणे अंधारात का?” असा जाब त्यांनी विचारला. यावर मुख्य अभियंता राख यांनी, दोडामार्ग येथील तांत्रिक दोष (फॉल्ट) काढण्याचे काम सुरू असून पुढील दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, अशी ग्वाही दिली.
​या बैठकीला बाळ बोर्डेकर, संजय लाड, संदीप सुकी, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव, जितेंद्र गावकर, शेखर पाडगांवकर यांच्यासह सांगेली, मळगाव ,आणि शिरशिंगे परिसरातील अनेक त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा