सिंधुदुर्ग : अपघातमुक्तीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

शेअर करा

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक

सिंधुदुर्ग,दि.१ सप्टेंबर

जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी करून अपघातमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. रस्ते, वाहतूक नियंत्रण तसेच रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात झाली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यात वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेऊन तेथे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांसह संबंधित सर्व यंत्रणांनी रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावणे, रस्त्यांच्या कडेला असलेले भराव व्यवस्थित करणे, झाडांची छाटणी करणे तसेच सुरक्षा भिंतींची कामे पूर्ण करणे यांसारख्या उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी नागरिकांनी वाहने जबाबदारीने चालवावीत यासाठी वेळोवेळी जनजागृती करावी, अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत विविध माध्यमांतून जनजागृती मोहिमा राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रस्त्यांच्या कडेला होणारी अवैध वाहनतळे तसेच अतिक्रमणे हटविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवावी. विशेषतः राष्ट्रीय महामार्गांवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाहनांना होणाऱ्या धडकांमुळे अनेक अपघात होत असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.

जिल्ह्यात वाहतूक टास्कफोर्सची स्थापना
रस्त्याच्या कडेला अवैधपणे वाहने उभी करणे किंवा विनाकारण वाहने थांबविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर जिल्हा वाहतूक टास्कफोर्स स्थापन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा वाहतूक टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

‘संजया’ डॅशबोर्डद्वारे अपघातांचे विश्लेषण
बैठकीत आयआयटी मद्रासच्या सहकार्याने जिल्ह्यात वापरण्यात येत असलेल्या ‘संजया’ डॅशबोर्डची माहिती रोशन जोस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली. या डॅशबोर्डवर जिल्ह्यात घडणाऱ्या अपघातांची ठिकाणे, अपघातांचे तपशील, त्यामागील संभाव्य कारणे, करावयाच्या उपाययोजना आणि संबंधित विभागाची जबाबदारी यासंबंधी माहिती नोंदविली जाते. त्यामुळे अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे संबंधित विभागांना शक्य होते. तसेच, सर्वाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन होणारे भाग शोधणे, विशिष्ट महामार्ग किंवा रस्त्यांच्या तुकड्यांवरील अपघातांचे पॅटर्न तपासणे आणि त्यानुसार उपाययोजना निश्चित करण्यासाठी या डॅशबोर्डचा प्रभावी वापर शासकीय यंत्रणांनी करावा, असे आवाहन करण्यात आले.

शेअर करा