दि. ८ व ९ ऑगस्ट रोजी आयोजन
कोकण विभागातून ५० प्रतिनिधी उपस्थित राहणार
समाज भूषण, पंचप्राण व उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार वितरण
विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा
वैभववाडी,दि.०६ ऑगस्ट
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२६ चे राज्य अधिवेशन वडगाव मावळ, जि.पुणे येथे शनिवार दि.८ व रविवार दि.९ ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.
संस्थेच्या राज्यातील ३० जिल्ह्यांमधून जवळपास ५०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी राज्य अधिवेशन आणि अभ्यास वर्गासाठी उपस्थित राहणार आहेत.
सदर अधिवेशन शिवराज पॅलेस, मुंबई पुणे हायवे, वडगाव मावळ जि.पुणे येथे संपन्न होत आहे.
या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री. सुरेंद्र तावडे, अध्यक्ष, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग हे करणार आहेत. यावेळी मा. सुनील (आण्णा) शेळके, आमदार, मावळ विधानसभा, मा. संजय उर्फ बाळा भेगडे, मा. राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. सुभाष बापू देशमुख, माजी सहकार वस्त्र उद्योगमंत्री तथा आमदार दक्षिण सोलापूर, माननीय सुधीरभाऊ मुनगुंटीवार, माजी अर्थमंत्री तथा आमदार बल्लारशाह विधानसभा, मा. राजेंद्र पवार, संचालक, मानव संसाधन महावितरण मुंबई आणि मा. कॅप्टन विलासराव कात्रे, प्रसिद्ध उद्योजक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी समाज भूषण पुरस्कार माननीय श्री.रामराव जगदाळे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघटना यांना देण्यात येणार आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचे कार्य ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानावर आधारित असून ग्राहकांचे प्रबोधन, संघटन आणि मार्गदर्शन यासाठी ही संस्था कार्यरत आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी शेतकरी, उद्योजक, व्यापारी, श्रमिक आणि ग्राहक हे पाच मुख्य अंग मानते. कल्याणकारी अर्थव्यवस्थेसाठी या पाच घटकांमध्ये समन्वय असावा असा आग्रह ग्राहक पंचायत महाराष्ट्र धरते. या पाच घटकांमध्ये ग्राहकाभिमुख कार्य करणाऱ्यांना व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या वर्षी
१) श्रमिक-श्री.विठोबा लछिराम ज्ञानज्ञान (नाशिक)
२) व्यापारी-श्रीमती सुविधी सुधीर जयस्वाल (नागपूर)
३) शेतकरी-श्री.पांडुरंग कुंडलिक बरळ (पुणे) ४)उद्योजक-रयत आरोग्य मंडळ (नांदेड) आणि
५) ग्राहक- सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) यांना मान्यवरांच्या हस्ते “अर्थव्यवस्थेचे पंचप्राण” हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
राज्यातील सहा महसुली विभागांप्रमाणे प्रत्येक विभागातील “उत्कृष्ट कार्यकर्ता” म्हणून सहा साधकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
नितीन मुकेवार (नागपूर विभाग), उदय अग्निहोत्री (नाशिक विभाग), विष्णूप्रसाद दळवी (कोकण विभाग), रावसाहेब गर्जे (छ. संभाजी नगर), रवींद्र ठाकरे (अमरावती विभाग), बाळासाहेब चव्हाण (पुणे विभाग)
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या या राज्य अधिवेशनातील दोन दिवसीय कार्यक्रमात अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त, शेतकरी ग्राहकांसाठी श्री.सर्जेराव जाधव (राज्य संघटक) यांचे प्रबोधन, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची त्रिसूत्री आणि कार्यपद्धती यावर प्रा. एस.एन.पाटील (राज्य सहसचिव), विजेच्या संदर्भात वीज गाऱ्हाणे निवारण मंचाची कार्यपद्धती यावर मा. अध्यक्ष श्री.महेंद्र दिवाकर यांचे प्रबोधन होईल.
२०४७ मध्ये विश्ववंदिता भारत निर्माण व्हावा यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र सजग विद्यार्थी ग्राहक अभियान ही संकल्पना राबवणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये “ग्राहक दृष्टीचा तिसरा डोळा” जागृत व्हावा यासाठी सौ.मेधा कुलकर्णी (राज्य सहसंघटक), कार्यकर्ता कसा असावा यावर प्रा.चंद्रकांत डागा (राज्य कार्यकारणी सदस्य), मुंबई नर्सिंग कायदा यावर डॉ. ज्ञानचंद्र पाटील (सांगली जिल्हा अध्यक्ष) यांचे मार्गदर्शन तसेच सामान्य ग्राहकांना भेडसावणारा सायबर क्राईम या ज्वलंत विषयावर श्री.योगेश ठाणगे यांचे मार्गदर्शन होणार आहे. महाराष्ट्र राज्याची अमृत योजनेचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री.विजय बिंदुमाधव जोशी यांचे उद्बोधन तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आणि ग्राहक आयोगाचे कार्य यावर ज्येष्ठ पत्रकार आणि विदर्भ प्रांताचे अध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.शामकांत पात्रीकर यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभणार आहे. या दोन दिवसीय अभ्यास वर्गाचा समारोप राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.
ग्राहकांचे संघटन आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांना या राज्य अभ्यास वर्गातून मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणार आहे अशी माहिती संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड, संघटक श्री. सर्जेराव जाधव व सचिव श्री.अरूण वाघमारे यांनी दिली.
राज्य अधिवेशनाच्या अधिक माहितीसाठी कोकण विभागातील प्रतिनिधींनी राज्य सहसचिव व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील, संघटक श्री. विष्णूप्रसाद दळवी व सचिव श्री. संदेश तुळसणकर यांच्याशी संपर्क साधावा.