वनविभागासमोरील गटारात चारचाकी, दुचाकी अडकली
सावंतवाडी, दि. ९ जून
शहरातील वन विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या मोरीच्या कामामुळे आणि नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ऐन पावसाळ्यात वाहनचालक आणि नागरिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी सकाळी रस्त्यावर साचलेल्या ढोपरभर पाण्यात गटाराचा अंदाज न आल्याने एक चारचाकी गाडी थेट गटारात रुतली. अखेर टोईंग व्हॅनच्या सहाय्याने तासाभराच्या प्रयत्नांनंतर ही गाडी बाहेर काढण्यात आली. या गोंधळामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामध्ये एसटी बसेसही अडकून पडल्या होत्या.
निष्काळजीपणाचा कळस; बॅरिकेड्सही नाही:
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी १५ दिवसांपूर्वी मोरीचे काम करण्यात आले होते. मात्र, काम करताना शेजारील गटाराच्या पाण्याचा निचरा कसा होणार, याची कोणतीही पूर्वदक्षता ठेकेदार किंवा नगरपालिकेने घेतली नव्हती. पाऊस सुरू होताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यातच ‘येथे उघडे गटार आहे’ हे दाखवण्यासाठी नगरपरिषद किंवा ठेकेदाराने साधे बॅरिकेड्स अथवा सूचनाफलकही लावले नव्हते. परिणामी, मंगळवारी सकाळी वाहनचालकांना पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी गटारात अडकली. गाडी काढण्याच्या मदतकार्यात पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनीही पुढाकार घेतला.
“मोरीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, नगरपरिषद उघड्या गटाराशेजारी बॅरिकेड्स लावण्याची तसदीही घेत नाही. चार गाड्या आणि लोक गटारात अडकल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? भर पावसात ही कामे कशासाठी सुरू आहेत?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे. तसेच या अनागोंदी कारभारापेक्षा ‘प्रशासकीय राजवटच बरी होती,’ अशी उद्विग्न भावनाही शहरवासीयांनी व्यक्त केली.
’आचारसंहिते’चे कारण पुढे

या संपूर्ण प्रकाराबाबत नगरपरिषदेच्या बांधकाम अभियंत्यांना विचारणा केली असता, ” निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने वर्क ऑर्डर मिळण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच काम सुरू होण्यास विलंब झाला,” असे सांगून त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाच्या या विलंबाचा नाहक फटका आता सर्वसामान्य सावंतवाडीकरांना आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहने गटारात रूतली. सुदैवाने धक्कादायक प्रकार घडला नाही हे नशीब!या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने सावकाश व जपून हाकावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.