मुंबईकडे जाण्याचा एकमेव पर्याय बंद; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक फटका, तातडीने फेरी पूर्ववत करण्याची मागणी
देवगड,दि.२१ जुलै
गेल्या काही दिवसांपासून देवगड–बोरिवली ही एसटीची नियमित फेरी कोणतीही ठोस पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. देवगड तालुक्यातील नागरिकांसाठी मुंबई गाठण्याचा हा सर्वात सोयीचा आणि विश्वासार्ह पर्याय मानला जात होता. मात्र ही फेरी बंद झाल्यामुळे प्रवाशांवर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करण्याची वेळ आली असून आगार प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरील उत्पन्न कमी असल्याचे कारण पुढे करत ही फेरी बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, केवळ उत्पन्नाचा निकष लावून अनेक वर्षांपासून सुरू असलेली आणि हजारो प्रवाशांच्या दैनंदिन गरजेशी निगडित असलेली सेवा बंद करणे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
देवगड तालुक्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी हा सर्वात परवडणारा प्रवासाचा पर्याय होता. ही फेरी बंद झाल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी जादा भाडे मोजावे लागत आहे. परिणामी शासनाने दिलेल्या प्रवासी सवलतींचा लाभही देवगडवासीयांना मिळेनासा झाला आहे.
याशिवाय देवगड आगारातील इतरही अनेक फेऱ्या वारंवार रद्द होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ऐनवेळी फेरी रद्द झाल्यामुळे प्रवाशांची नियोजित कामे खोळंबत असून रेल्वे, रुग्णालय, नोकरी, शैक्षणिक प्रवेश तसेच इतर महत्त्वाच्या कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना आर्थिक फटका आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.
देवगड आगारातील वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली असून आगार प्रशासनाने केवळ उत्पन्नाचा विचार न करता प्रवाशांची गरज, त्यांची गैरसोय आणि सार्वजनिक सेवेचे सामाजिक दायित्व लक्षात घेणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
देवगड–बोरिवली फेरी तातडीने पूर्ववत सुरू करावी, बंद असलेल्या इतर फेऱ्याही नियमित कराव्यात आणि प्रवाशांची होणारी गैरसोय त्वरित दूर करावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त प्रवाशांनी दिला आहे.