मालवण: वडाचापाट हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक राखी पौर्णिमा उत्साहात

शेअर करा

हरितसेना उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव; परंपरेसोबत निसर्गरक्षणाचा संदेश

मालवण,दि.०२ सप्टेंबर

भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचलित श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथे हरितसेना उपक्रमांतर्गत यंदाची राखी पौर्णिमा पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. परंपरेचा आदर राखतानाच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्याचा कौतुकास्पद उपक्रम यावेळी राबविण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी पान-फुले, सूक्ष्म नैसर्गिक साहित्य आणि रंगीत धाग्यांचा वापर करून आकर्षक व पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. या राख्या वटवृक्षाला बांधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही पर्यावरणपूरक राख्या बांधून पारंपरिक स्नेहाचे दर्शन घडविले. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी वटवृक्षाचे महत्त्व तसेच वृक्षसंरक्षणाची गरज विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी अशा पर्यावरणपूरक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी प्रशालेच्या शिक्षिका वेदिका दळवी, प्रतिभा केळूसकर, अन्वी पाटकर, MSAT विभागाचे निदेशक जगन्नाथ आंगणे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

शेअर करा