​​सावंतवाडी : कोकण रेल्वेचे दुपदरीकरण झाल्यास गाड्यांचा वेग व संख्या वाढेल: आमदार दीपक केसरकर

शेअर करा

सावंतवाडी, दि. १३ जुलै
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी असून, दुपदरीकरण झाल्यास रेल्वेचा वेग आणि गाड्यांची संख्या वाढून प्रवाशांना मोठा फायदा होईल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी स्थानकावर जादा रेल्वेगाड्यांना थांबा मिळण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे प्रयत्नशील असून, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून आधीच तीन गाड्यांना थांबा मिळाला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


​सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याच्या योजनेसाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता ही योजना ‘सिंधुरत्न’ योजनेतून राबवण्याला प्राधान्य दिले जाईल आणि लवकरच या संदर्भातील बैठक होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
​आमदार केसरकर यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर आपली भूमिका मांडली:
​लाडकी बहीण योजना: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी ज्यांची बँक केवायसी (KYC) झाली नसेल, त्यांनी ती तातडीने करून घेणे गरजेचे आहे.


​विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद: माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनबाईंनी केलेल्या तक्रारीबाबत घरगुती विषयांवर जाहीर चर्चा होणे योग्य नाही. मात्र, पीडित महिलेला न्याय मिळालाच पाहिजे आणि पोलीस यावर योग्य ती कारवाई करतील.
​तिलारी पाणी योजना: वीज खंडित झाल्यामुळे १९ गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. हे पंप मोठे असल्याने तिथे जनरेटर बसवणे शक्य नाही. त्यामुळे ‘आडाळी’ एमआयडीसीकडे होणाऱ्या सबस्टेशनमधून डबल लाईन टाकून पर्यायी मार्ग शोधला जाईल.
​शेतीचे नुकसान: सध्या पाऊस नसल्याने भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांमार्फत तातडीने सर्वेक्षण केले जाईल.


​पर्यटन व विकास: सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले हे तालुके पर्यटनासाठी अत्यंत योग्य आहेत. येथील पर्यटनाच्या संधी शोधून विकास करण्यावर आपला मुख्य कल आहे. तसेच, सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील टक्केवारीच्या आरोपांची सत्यता तपासून पाहिली पाहिजे.


​सुरक्षारक्षक दल: पोलीस ग्राउंड येथे सुरक्षारक्षक दलासाठी पायाभूत सुविधांचे काही काम अपूर्ण आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे सांगत, फडणवीस चांगले काम करत असून त्यांनीच मुख्यमंत्री राहावे अशी आमची इच्छा असल्याचे केसरकर म्हणाले.
​वैश्य भवन वाद: वैश्य भवनचा प्रश्न सध्या धर्मादाय आयुक्तांकडे (चॅरिटी कमिशनर) सुरू असून तिथून न्याय मिळेलच. मात्र, यामुळे समाजाच्या ऐक्याला तडा जाणार नाही याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

शेअर करा