सोशल मिडियावर डिवचणाऱ्या कमेंट्स
सावंतवाडी ,दि. १० जून
सावंतवाडी : शहरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम करणाऱ्या एमएनजीएल कंपनीच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारामुळे शहरातील रस्ते चालण्यासाठी देखील योग्य राहीलेले नाहीत. ते अपघातांचे सापळे बनत चालले असून जर हानी झाली तर जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर संबंधित कंपनी, ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे शहरात अपघातांची मालिका सुरू झाली आहे. आज कारागृहा शेजारील रस्त्यावर एक ऑटो रिक्षा थेट या कंपनीने खोदलेल्या चरात रुतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र, रिक्षा बाहेर काढताना चालक आणि प्रवाशांची मोठी कसरत झाली. बेफिकीर काम अन् नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीची अनास्था याला कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, सोशल मिडियावर प्रसिद्ध झालेल्या याबाबतच्या बातम्यानंतर नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत मताचा रेट किती होता ? असे सवाल करत त्याचीच ही किंमत असल्याच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.