नव्या इमारतीतील गंभीर त्रुटींमुळे रहिवासी त्रस्त; ४८ तासांत तोडगा न निघाल्यास उपोषणाचा इशारा, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे न्यायाची मागणी
सावंतवाडी,दि.०९ जुलै
नवं हक्काचं घर घेऊन अवघ्या दीड-दोन वर्षातच इमारतीमधील गंभीर त्रुटींमुळे रहिवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. हा धक्कादायक प्रकार सावंतवाडीत समोर आला आहे. न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद येथील ‘टीचर कॉलनी सोसायटी’च्या बिल्डरने रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी संतप्त नागरिकांनी थेट सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांकडे धाव घेत तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पुढील ४८ तासांत यावर योग्य तो तोडगा न निघाल्यास नगरपरिषद आवारात उपोषणाला बसण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. तसेच खोट्या केसीस टाकणाऱ्या बिल्डरवर कडक शासन करून पालकमंत्री नितेश राणे यांनी न्याय द्यावा अशीही मागणी महिलांनी केली आहे.
रहिवासी म्हणालेत की, ‘एमएस पटेल कन्स्ट्रकशन’चे मोसिम पटेल आणि राफीक पटेल यांनी फ्लॅट विक्रीच्यावेळी अनेक मोठी आश्वासने दिली होती. मात्र, आज वर्षभरानंतरही पाण्यासह महत्त्वाच्या सुविधांबाबत फसवणूक केली आहे. पार्किंगच्या जागेवर रो-हाउस उभारले जात असून बुकिंगच्यावेळी जी जागा पार्किंगसाठी दाखवण्यात आली होती त्या जागेवर बिल्डरने बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केले आहे. दोन वर्षांचा देखभाल खर्च आगाऊ घेऊनही इमारतीची कोणतीही देखभाल केली नाही. तसेच वारंवार पाठपुरावा करूनही ‘सेल डीड’ करून देण्यास बिल्डर टाळाटाळ करत आहे. तसेच इमारतीत पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुरक्षित सोय नसल्याने रहिवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसून बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत आहे. न.प.च एकच कनेक्शन असून मुबलक पाणी मिळत नाही. पाण्याची टाकी हीच विहीरी असल्याचे बिल्डरने खोटे सांगत फसवणूक केली असून आता बोअरवेलचही पाणी दिलं जात नाही. भरपूर वर्ष पाणी वापरलात आता नगरपरिषदेला धडक द्या, अशी उत्तर बिल्डर देत आहे. त्यातच ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने इमारतीभोवती सांडपाणी साचून डास आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ३५ हून अधिक कुटुंब या इमारतीत राहत असून बिल्डर जीव देतो असं सांगत आहे. मात्र, त्याच्या या करारनाम्यामुळे आमच्यावर जीव द्यायची वेळ आल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखवली.
तसेच या प्रकारामुळे इमारतीत राहणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि आजारी व्यक्तींचे आरोग्य धोक्यात आले आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे वृद्धांना पायऱ्यांवरून ये-जा करावी लागत असून त्यांचा मोठा अपघात होण्याची भीती आहे. इमारतीची लिफ्ट वारंवार बंद पडत असून कंपाऊंड फेन्सिंग, मुख्य प्रवेशद्वार आणि पेव्हर ब्लॉकचे काम अपूर्णच टाकले आहे. अवघ्या एका वर्षात इमारतीला आणि फ्लॅटमध्ये मोठ्या भेगा गेल्या आहेत. बांधकामासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. एवढी दयनीय असताना, प्राथमिक सुविधा आणि कायदेशीर बाबींची पूर्तता नसतानाही सावंतवाडी नगरपालिकेने या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र कसे मंजूर केले ? असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. तर बिल्डरचे हे कृत्य महाराष्ट्रातील गृहनिर्माण कायदे आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन करणारे आहे. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून बिल्डरवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. बिल्डरला वारंवार सांगूनही त्यांनी कामे पूर्ण करण्यास नकार दिला आहे. जर पुढील ४८ तासांत नगरपरिषदेने यावर ठोस पर्याय किंवा कारवाई केली नाही, तर आम्ही सर्व रहिवासी नगरपरिषद आवारात बेमुदत उपोषणाला बसणार, असा आक्रमक पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे.
यावेळी १५ दिवस पाणी नसल्याने व बिल्डरच्या फसवणुकीत भरडल्या गेलेल्या महिलांना अश्रू अनावर झाले. या महिलांना आधार देत नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पाहणी करण्यासह संबंधितावर योय ती कारवाई केली जाईल, तसेच प्रशासकीय काळात झालेल्या कामाचीही चौकशी केली जाईल असे मत व्यक्त केले. यावेळी स्थानिक नगरसेविका सुनिता पेडणेकर, ॲड सिद्धार्थ भांबुरे तसेच सभापती सुधीर आडीवरेकर, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांनी आम्ही सामान्य कुटुंबातील लोक असून पाणी नसल्याने खूप हाल होत आहेत. पाण्याचा बंब देखील आज बिल्डरच्या चुकीमुळे दारात येऊ शकत नाही. त्यामुळे बँकांचे हप्ते भरायचे की पाण्यासाठी पैसा खर्च करायचा हा प्रश्न आहे. गेले काही दिवस पावसाचं पाणी वापरून आम्ही दिवस काढलेत. आज या बिल्डरने आमच्या विरोधात खोट्या केसीस दाखल केल्या असून पालकमंत्री नितेश राणे यांनी आम्हाला न्याय द्यावा, संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी टीचर कॉलनी सोसा. रहिवासी महिला, पुरुष, ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.