घोटगे येथे पाच दिवसांपासून हत्तींचा धुमाकूळ; २३ वर्षांपासून सुरू असलेल्या समस्येवर सरकार व वन विभाग अपयशी असल्याची टीका, अधिकाऱ्यांसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी.
दोडामार्ग, दि. २६ जुलै
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात गेल्या २३ वर्षापासून जंगली हत्ती उपद्रव सुरू आहे. राज्यात अनेक मंञी झाले पण दोडामार्ग तालुक्यातील हत्ती समस्या सोडविण्यासाठी हत्ती मुक्त दोडामार्ग करण्यासाठी वन अधिकारी सरकार अपयशी ठरले आहे. घोटगे गावातील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते संतोष दळवी यांनी जीवाचे रान करून निर्माण केलेली बागायती उध्वस्त केल्या जात आहेत. गेल्या पाच दिवसापासून संतोष दळवी यांच्या बागेत स्थिरावलेल्या हत्ती कळपाने पूर्ण वाट लावून लाखो रुपये नुकसान केले आहे. या ठिकाणी दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील वनपाल गिते तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबू गवस यांनी पाहणी केली.
दोडामार्ग तालुक्यातील हत्ती पकड मोहीम सहज शक्य असताना सरकार हत्ती उपाययोजना नावाखाली करोडो रूपये विनाकारण गरज नसताना खर्च करत आहे. मात्र शेतकरी लोकांचे झालेले नुकसान भरून येईल एवढी भरपाई दिली जात नाही. जखमेवर मीठ चोळले जात आहे.
घोटगे गावातील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते संतोष दळवी यांनी आपल्या मालकीच्या जागेत लाखो रुपये खर्च करून, नारळ, सुपारी, इतर फळझाडे, सागवान, बाबू, इतर लागवड केली होती. नारळाची झाडे लागायला सुरुवात झाली होती. पण गेल्या वर्षी हत्ती कळपाने जवळपास वीस लाखाचे नुकसान केले. पण काही झाडांचा समावेश भरपाई मध्ये नसल्याने यावर पाणी सोडावे लागले.