सावंतवाडी, दि. ०८ जुलै
कोकणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी भर पडली असून, सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस वर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रतिष्ठेच्या राजधानी एक्स्प्रेससह अन्य दोन एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील अधिकृत मंजुरीचे पत्र जारी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस वर जनसुविधेच्या दृष्टीने महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वे विभागाने तीन गाड्यांना मंजुरी दिली आहे:
थांबा मिळालेल्या गाड्या :
गाडी क्र. १२१३३ / १२१३४: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्स्प्रेस.
गाडी क्र. १२४३१ / १२४३२: तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस.
गाडी क्र. १२२०१ / १२२०२: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्स्प्रेस.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि विशेषतः सावंतवाडी परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. या थांब्यांमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक आर्थिक विकासालाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
गरिब रथ व राजधानी एक्सप्रेस करोना काळात बंद करण्यात आल्या होत्या. या गाड्या सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना सतत पाठपुरावा करत होती.
दरम्यान रेल्वे प्रवासी संघटनेचे विनोद नाईक राणे यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला असता मुख्यमंत्री यांनी दखल घेत स्वतः रेल्वेमंत्री यांना लेखी पत्राद्वारे लक्ष वेधले होते.