सावंतवाडी : विभागीय आयुक्तांकडून भालावल ग्रा.प.च्या उपक्रमांचे कौतुक

शेअर करा

सावंतवाडी दि.०४ जुलै

कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील भालावल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीने दैनंदिन प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच ई-ऑफिस प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करून ग्रामीण प्रशासनात डिजिटल परिवर्तनाची प्रभावी दिशा निर्माण केली असल्याचे सांगत त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले.

भालावल ग्रामपंचायत ही जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पारदर्शकता, गतिमान सेवा आणि नागरिकाभिमुख प्रशासन या दृष्टीने ग्रामपंचायतीने केलेले कार्य इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असल्याचे विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी यावेळी नमूद केले.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, प्रभारी उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, ग्रामसेविका तृप्ती राणे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायती तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती ग्रामसेविका तृप्ती राणे यांनी सादरीकरणाव्दारे दिली.

भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत कार्यरत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध स्थानिक उत्पादनांची पाहणी केली. ग्रामीण महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाची वाट स्वीकारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. उत्पादनांची गुणवत्ता, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी श्री. परब यांच्या घरकुलाला भेट देऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. लाभार्थ्याशी संवाद साधून योजनेमुळे झालेल्या बदलांची माहिती घेतली. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील आणि सक्रियपणे कार्य करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. गावातील महिला, ग्रामस्थ आणि लाभार्थ्यांशी संवाद साधताना श्रीमती अग्रवाल यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. लोकसहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शक प्रशासन यांच्या समन्वयातून ग्रामीण विकासाला अधिक गती मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सरपंचांनी विभागीय आयुक्तांना दिली. ग्रामपंचायतीने स्वीकारलेल्या डिजिटल कार्यपद्धती, सुशासनाची संकल्पना आणि लोकाभिमुख उपक्रमांचे विभागीय आयुक्तांनी कौतुक करत अशा उपक्रमांची इतर ग्रामपंचायतींनीही अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शेअर करा