सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय; आमदार दीपक केसरकर

शेअर करा

सावंतवाडी,दि.२२ जुलै
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे नेतृत्व आहे. हे दोघे एकत्र राहून राज्याच्या प्रगतीला सदैव प्राधान्य देतील, असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


​पत्रकार परिषदेत बोलताना आमदार केसरकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा आणि प्रशासकीय अनुभवांचा आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मिळालेल्या गृह, अर्थ राज्यमंत्री यांसारख्या विविध मंत्रिपदांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले. सिंधू रत्न योजना पुढे चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शिक्षण व मराठी भाषा मंत्री, मुंबई व कोल्हापूर पालकमंत्री जबाबदारी दिली होती त्यामुळे मला ध्येयाच्या दिशेने वाटचाल करता आली.
​आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा विकास:
सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकरणी खंडपीठापुढे सुनावणी झाली असून, याबाबत राजघराण्याकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांची निर्मिती वेगाने सुरू असल्याचे सांगितले. सावंतवाडी एसटी बस डेपो अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.


​पर्यटन, कृषी आणि स्थानिक रोजगाराला चालना:
शासकीय योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. यात तिलारी येथे ॲम्युझमेंट पार्क, वॉटर स्पोर्ट्स, बोटींग प्रकल्प, वन्यप्राणी संवर्धन, मोती तलावात बोटींग प्रकल्प, नरेंद्र डोंगरावर योगा सेंटर, तसेच सावंतवाडी आणि आंबोली येथे रोप-वे सर्वेक्षणाचा समावेश आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्य लाभत आहे, असे त्यांनी सांगितले.


​याशिवाय आंबोली, चौकुळ व गेळे भागाचा पर्यटन विकास, आंबोली परिसरात गोल्फ कोर्स, फुकेरी घाट-हनुमंतगड-चौकुळ जोडणारा घाट रस्ता आणि सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील घाट जोडणाऱ्या रस्ते विकास कामांवर भर दिला जात आहे. संकेश्वर ते बांदा नॅशनल हायवे, शहरात अंडरग्राउंड पार्किंग आणि अंडरग्राउंड गटार व्यवस्था करून सावंतवाडी शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न असल्याचे केसरकर म्हणाले.


​कृषी आणि उद्योग क्षेत्रात आंबा पिकावरील फळमाशी नियंत्रण, नारळापासून निरा व साखर निर्मिती, हळद लागवड, मधुमक्षिका पालन, ५० टक्के अनुदानावर पर्यटन घरकुल प्रकल्प, तसेच मच्छीमारांना बोटी व महिलांना गाड्यांचे वाटप यांसारख्या उपक्रमांतून स्थानिकांना आर्थिक सक्षम केले जात आहे. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तिन्ही तालुक्यांत क्रीडांगणे उभारली जात आहेत.


​शैक्षणिक गोंधळावर भाष्य:
दिल्लीतील ‘नीट’ (NEET) परीक्षेबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, कोचिंग क्लासेसचा धंदा झाल्यामुळे आणि लोभामुळे पेपर फुटण्याचे प्रकार घडतात. यासाठी शैक्षणिक पद्धतीत आणि बारावीच्या परीक्षा पद्धतीत योग्य बदल घडवून आणणे गरजेचे आहे. युवकांना विश्वासात घेऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार केसरकर म्हणाले की, आपण शिवसेनेत असून मंत्रीपदाबाबतचा निर्णय पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. पुन्हा संधी मिळाल्यास अधिक गतीने काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रयत्न केला जात आहे तसेच येणारे वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आमुलाग्र बदल घडवणारे आणि आर्थिक भरभराटीचे ठरेल, असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गृहराज्यमंत्री पद मिळाले होते याबाबत माहिती देताना ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला गृहराज्यमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला गृहराज्यमंत्री पदी ठेवले उलट शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्री पद दिले ही आठवण सांगताना श्री फडणवीस यांचे आपल्याला प्रेम लाभत असते असे स्पष्ट केले.तर स्वर्गिय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादा स्पष्ट बोलत. त्यांचा मला मोठा सहवास लाभला. दूरदृष्टी नेतृत्व होते. त्यांनी बोले तैसा चाले असं नेतृत्व केले असे श्री केसरकर यांनी सांगितले.

शेअर करा