सावंतवाडी, दि. १३ जुलै
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये (MIDC) झालेल्या बेकायदेशीर माती उत्खनन प्रकरणाची उद्योग विभागामार्फत चौकशी सुरू असून, यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. सावंतवाडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत ॲड. स्वप्नील प्रभू-आजगावकर उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, “आडाळी एमआयडीसीमधील माती उत्खननाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा चौकशी अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. फळ प्रक्रिया उद्योग (फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री) सुरू व्हावेत, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आडाळीत नवे उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्याला आमदार दीपक केसरकर उपस्थित होते.”
जनतेला विश्वासात घेऊनच प्रकल्प
आजगाव परिसरात नियोजित लोह खनिज प्रकल्प आणि औष्णिक वीज प्रकल्पाबाबत विचारले असता, “शासन पूर्णपणे जनतेच्या सोबत आहे,” असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. “स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही प्रकल्प लादले जाणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास प्रामुख्याने पर्यटनाच्या माध्यमातून होत असल्याने पर्यटन क्षेत्रालाच आमचे मुख्य प्राधान्य राहील,” असेही त्यांनी नमूद केले.
मालवण मतदारसंघात भाषा संशोधन केंद्र
जिल्ह्यात भाषा भवन उभारण्याबाबत माजी आमदार निलेश राणे यांनी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत, त्यांच्याच मतदार संघात (कुडाळ-मालवण) भव्य ‘भाषा संशोधन केंद्र’ उभारण्यात येणार असल्याची घोषणाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली.