सावंतवाडी,दि.९ जुलै
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी सादर करावा लागणारा हयात दाखला ऑनलाईन करण्याची अट शिथिल करण्यात यावी, या मागणीसाठी सावंतवाडीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यापूर्वी लाभार्थ्यांचे हयात दाखले हे बँक मॅनेजरच्या दाखल्यावर ग्राह्य मानले जात होते. परंतु, सन २०२६ सालापासून हे दाखले बँक मॅनेजरच्या दाखल्याव्यतिरिक्त ऑनलाईन पद्धतीनेच करण्याची अट जारी करण्यात आली आहे. या ऑनलाईन दाखल्यांची मुदत ३० जून पर्यंत ठेवण्यात आली होती. या जाचक अटीमुळे दुर्गम भागातील वृद्ध व अपंग लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बहुतांशी डोंगराळ भागात समाविष्ट असल्याने येथील दुर्गम गावांमध्ये हवामान आणि इंटरनेट सेवेचा मोठा प्रश्न असतो. सध्या शालेय शिक्षणाचे दाखलेही ऑनलाईन पद्धतीने घेतले जात असल्याने इंटरनेट सर्व्हरवर प्रचंड ताण येतो. अनेकदा ४ ते ८ दिवस सर्व्हर योग्य रीतीने चालत नाही. अशा परिस्थितीत हतबल वृद्ध लाभार्थ्यांना ऑनलाईन दाखले गोळा करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होणे शक्य नसल्याने शासनाने घातलेली ऑनलाईनची अट मुदतीत पूर्ण होऊ शकत नाही.
शासनाच्या या नवीन ऑनलाईन अटीमुळे गरजू लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही ऑनलाईनची अट शिथिल करावी आणि पूर्वीप्रमाणेच बँक मॅनेजरच्या स्वाक्षरीने मिळणारा दाखला ग्राह्य धरून लाभार्थ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या निवेदनावर संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष श्री. अशोक दळवी, माजी अध्यक्ष श्री. गजानन नाटेकर, शिवसेना तालुकाप्रमुख (सावंतवाडी), माजी सदस्य श्री. नारायण राणे, श्री. विनोद सावंत, श्री. संदेश सोनुर्लेकर, भटक्या विमुक्त समाज शिवसेना अध्यक्ष श्री. संजय गावडे, ओटवणेचे माजी सरपंच श्री. उमेश गावकर, शिवसेना विभागप्रमुख श्री. महेश सावंत, उपतालुकाप्रमुख श्री. राकेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन दिले.