सावंतवाडी,दि.१५ जून
माणसाचं जीवन निसर्गानं व्यापलं आहे. यात जून महिना महत्त्वाचा. पावसाचे आगमन होते, सर्वत्र सृजनाचा उत्सव सुरू होतो आणि साहित्यालाही बहर येतो. याच घटनेचे औचित्य साधून आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याने ‘निसर्गाच्या शब्दसान्निध्यात’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याला प्रतिसादही उत्तम लाभला.
आजगाव साहित्य कट्ट्याचा हा सलग मासिक ६८ वा कार्यक्रम होता. र.ग.खटखटे ग्रंथालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात निसर्ग विषयक कथा, कविता, ललितलेख यांचे सादरीकरण करण्यात आले.
ज्येष्ठ सदस्य शरद परूळेकर यांनी कट्ट्याच्या साहित्य कार्यक्रमासाठी सुमारे दहा हजार रुपयांची ध्वनीव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे व पर्यावरण प्रेमी गिरीधर राजाध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आले.
त्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला.कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक करून ‘आमचो मे म्हयनो ‘ ही मालवणी कविता सादर केली. त्यानंतर अरुण धर्णे यांनी श्रीकृष्णाच्या भासमान संवादावर आधारित ‘खरा राखणदार’ ही स्वरचित कथा सादर केली. नंतर सरोज रेडकर यांनी मधुरा माणगावकर यांच्या ‘पाऊस गंधाळताना’ या ललित लेखाचे वाचन केले. बाळकृष्ण राणे यांनी स्वानुभवातून उमललेली ‘रानाचं देणं’ ही स्वरचित कथा सादर केली. राजेश वैज यांनी स्नेहा नारींगणेकर यांच्या ‘पहिला पाऊस आणि कागदी घोडे’ या कथेचे वाचन केले आणि कमलेश अणावकर या युवा कलाकाराने व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘हस्ताचा पाऊस’ या कथेचे अभिवाचन केले. शेवटी प्रा.नीलम कांबळे यांनी राजा माळगी यांची ‘तो यावा प्रकाश म्हणून’ ही सुरेख कविता सादर केली.
या प्रसंगी अश्विनी पडवळ यांनी लहान मुलांसाठी निसर्ग विषयक पुस्तकांचा डिस्प्ले लावला होता ,त्या विषयीची भूमिका मांडली. ध्वनीव्यवस्था श्रद्धा राऊळ यांनी सांभाळली, तर खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी ऋणनिर्देश केला.
या कार्यक्रमाला अथर्व रांगणेकर, प्राची पालयेकर, लिना परब, रुहिना सय्यद, रामचंद्र बेहेरे, जयदीप देशपांडे,एकनाथ शेटकर, अविनाश जोशी, अनिता सौदागर आणि शेखर पणशीकर उपस्थित होते.