सावंतवाडी : आंबा-काजू उत्पादकांना २०९ कोटींची मदत; निलेश राणे शेतकऱ्यांचे तारणहार – संजू परब

शेअर करा

विधिमंडळातील आक्रमक भूमिकेनंतर अवघ्या १२ तासांत शासनाचा निर्णय; बागायतदारांसाठी मोठा दिलासा मिळाल्याचा दावा.

सावंतवाडी, दि. २६ जून
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांच्या आत शासनाने २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. आमदार निलेश राणे हे बागायतदार शेतकऱ्यांचे खरे तारणहार ठरले आहेत, असा गौरव शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला परीक्षित मांजरेकर आणि राकेश पवार उपस्थित होते.


​याबाबत अधिक माहिती देताना संजू परब म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी कोकणातील बागायतदारांची समस्या अत्यंत अभ्यासू आणि बेधडक शैलीत मांडली. त्यांनी कृषी विद्यापीठांचा सर्व्हे आणि प्रत्यक्ष परिस्थितीची तुलना करत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना धारेवर धरले. आमदार राणेंच्या या पवित्र्यामुळे शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागला आणि केवळ १२ तासांत याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी झाला. २०१३ नंतर आंबा-काजू उत्पादकांना मिळालेली ही पहिलीच मोठी नुकसानभरपाई आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा या निमित्ताने यशस्वी ठरला असून त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे.


​थेट बँक खात्यात जमा होणार मदत:
ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे कोकणातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून इनपुट सबसिडी स्वरूपात मदत दिली जाईल. शासनाच्या निकषांनुसार प्रति हेक्टर २२,५०० रुपये या दराने ही मदत थेट डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

​कोकणातील १.३४ लाख शेतकऱ्यांना लाभ:
या शासन निर्णयाचा लाभ ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील पाच जिल्ह्यांतील १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना होणार आहे. एकूण ९२,३४२.७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान यासाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९८.४४ कोटी रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ७९.०५ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. दीर्घकाळ मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणातील फलोत्पादकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास संजू परब यांनी व्यक्त केला.


आमदार निलेश राणे बेधडक प्रश्न मांडत आहेत त्यामुळे शेतकरी व बागायतदारांना आनंद झाला आहे. ते आमदार राणे यांना धन्यवाद देत आहेत. अभ्यासू वृत्ती अंगिकार करत त्यांनी बागायतदार शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला असल्याने न्याय मिळवून देऊ शकले असे श्री परब यांनी सांगितले

शेअर करा