सावंतवाडी, दि.३० मे
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था (कसाल), महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (सिंधुदुर्ग) आणि आंबोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आंबोली येथे पहिल्यांदाच दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला परिसरातील ४० हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते हेलन कीलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि स्वागत समारंभाने झाली. याप्रसंगी आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री वामन पालेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक नाटलेकर, ग्रामपंचायत अधिकारी एस. जी. गोसावी, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सविता गावडे, विनायक देसाई, साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, संस्था कर्मचारी विशाखा कासले, प्रसन्ना शिर्के, ललित गावडे आणि पवित्रा शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विशाखा कासले यांनी संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, “आम्ही तुमच्या दारापर्यंत तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहोत. दिव्यांग बांधवांनी या सुवर्णसंधीचा आणि मेळाव्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.”
आंबोलीच्या माजी सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनीही दिव्यांग बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. “तुमच्या ज्या काही समस्या किंवा अडचणी असतील त्या आमच्याकडे मांडा, आम्ही त्या सोडवण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करू. तसेच इतर तांत्रिक अडचणींचे निवारण अनिल शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करून घ्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
साहित्याचे वाटप:
या मेळाव्यादरम्यान साईकृपा संस्थेच्या वतीने नेहा पटकारे आणि सिद्धी पडवळ यांना कर्णयंत्र (कानाचे मशीन) प्रदान करण्यात आले, तर बाळकृष्ण गावडे यांना वॉकिंग स्टिक (चालण्याची काठी) देण्यात आली. तसेच उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना संस्थेच्या वतीने भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्था कर्मचारी सौ. शिर्के यांनी केले. तसेच हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री वामन पालेकर यांनी विशेष आभार मानले आहेत.