सावंतवाडी, दि. २२ मे
सावंतवाडी शहरात सध्या भटके कुत्रे आणि मोकाट पाळीव जनावरे वाहनचालकांसाठी मोठे ‘स्पीड ब्रेकर’ ठरत आहेत. या मोकाट जनावरांमुळे शहरात अपघाताचा धोका निर्माण झाला असून, नगरपरिषदेने या समस्येवर तातडीने आवर घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
शहरात सकाळी बाजारपेठेच्या भागात नागरिक आणि वाहनांची मोठी गर्दी असते. नेमक्या याच वेळी भटके कुत्रे आणि मोकाट पाळीव जनावरे भर बाजारातील मुख्य रस्त्यांवर ठाण मांडून बसतात किंवा थेट वाहनांसमोर उभी राहत आहेत. सकाळी कुत्र्यांचे टोळकेच्या टोळके रस्त्यावर फिरत असतात, तर दुसरीकडे पाळीव बैल आणि गाई कोणत्याही भीतीशिवाय संथ गतीने रस्त्यावरून चालत असतात. यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
या गंभीर समस्येबाबत नगरपरिषदेशी संपर्क साधला असता, पालिकेचा कोंडवाडा सध्या अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले. तसेच या मोकाट गुरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांना समज दिली जाईल, असे मोघम उत्तर नगरपरिषद प्रशासनाकडून मिळत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, कोंडवाडा नसला तरी पालिकेने पर्यायी व्यवस्था करून या समस्येचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.