सावंतवाडी,दि.०९ ऑगस्ट
जिल्हा परिषद केंद्र शाळा आजगाव क्रमांक १,येथील शिक्षक दत्तगुरु कांबळी यांची बदली झाल्याने त्यांच्या शैक्षणिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आजगाव ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दत्तगुरु कांबळी, प्रभारी सरपंच सुशील कामटेकर, माजी शिक्षक अरविंद प्रभू साळगावकर, विनायक उमर्ये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण हळदणकर, उपाध्यक्ष दशमी दळवी, अण्णा झांट्ये, विलासानंद मठकर, विशाखा कांबळी, विद्या विहारचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, गजानन काकतकर, वर्षा रेवाडकर, जितेंद्र मोरजकर, दिशा मालवणकर, केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दत्तगुरु कांबळी यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. त्यांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मिळालेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.तसेच विविध स्पर्धा परीक्षेतून आजगाव शाळा नंबर एक चे नाव राज्यस्तरापर्यंत पोहचविण्यात श्री.कांबळी यांचा महत्वाचा वाटा आहे.शाळेतील विद्यार्थ्यांनीही श्री.कांबळी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी आजगाव ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल ,श्रीफळ,सन्मानपत्र व भेटवस्तून देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना दत्तगुरु कांबळी यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीतील विविध अनुभव कथन केले. आजगाव शाळा, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांशी निर्माण झालेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करताना त्यांनी शाळेला आपण कधीही विसरणार नसल्याचे सांगितले. तसेच शाळेसाठी भविष्यातही आपले सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांनी आजगाव ग्रामस्थ, विविध मंडळे, पालक, विद्यार्थी व सहकारी शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी दत्तगुरु कांबळी यांच्या वतीने शाळा तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली पाटील यांनी केले. प्रास्ताविक दीपाली केदार यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका समृद्धी म्हाडगुत यांनी मानले. भावनिक वातावरणात झालेल्या या सत्कार समारंभातून ग्रामस्थांनी दत्तगुरु कांबळी यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.