जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांची माहिती.
सावंतवाडी,दि.३० जून
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशीवर प्रस्तावित असलेल्या व पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनात व दिनांक ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मनसेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या प्रकल्पाला आपला तीव्र विरोध दर्शविणार आहेत. मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व संदीप दळवी यांच्या सूचनेनुसार या पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या प्रकल्प विरोधी आंदोलनाला मनसेने आपला पूर्ण पाठिंबा जाहिर केला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात प्रदूषणकारी प्रकल्प येणार नसल्याची भाषा करतात तर खासदार महोदय या प्रकल्पांना कोण विरोध करतो तेच मी बघतो अशी धमकीची भाषा वापरतात त्या मुळे तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो असले दुपट्टी धोरण सत्ताधारी राबवत असून त्यामुळे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे असण्याची शंका जिल्हवासियाना येत आहे.
मा. राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी रत्नागिरी येथे झालेल्या जाहिर सभेत पर्यावरण या एका विषयावर कोकण किनारपट्टी संपूर्ण राज्याच अर्थकारण सुधारू शकते असे वक्तव्य केले होते. पण राजकारण्यांची पर्यावरण पूरक प्रकल्प कोकणात यावेत अशी मानसिकताच दिसून येत नाही त्यामुळे कोठे मायनिंग प्रकल्प तर कोठे औष्णिक ऊर्जा प्रकल्प असे कोकणवासीयांना नको असलेले व समृद्ध कोकणचा विनाश करणारे प्रकल्पच माथी मारले जात आहेत अशी टीका ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.