नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांचे निवेदन; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
सावंतवाडी,दि.२२ मे
शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असली, तरी दुसरीकडे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळ सुरू आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन शहरात भटक्या कुत्र्यांसाठी ‘आश्रयगृह’ उभारावे, अशी मागणी नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज झिरांगवाडी येथील स्थानिक महिलांना सोबत घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना निवेदन सादर केले.
मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनात अॅड. सायली दुभाषी यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. दोन दिवसांपूर्वी झिरांगवाडी येथे एक शाळकरी मुलगा सायकलवरून जात असताना भटक्या कुत्र्यांनी त्याच्या पाठी धावून त्याला चावा घेण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत तो मुलगा सायकलवरून खाली कोसळल्याने त्याला दुखापत झाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी असे प्रकार शहरात आता वारंवार घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरत असून ज्येष्ठ नागरिक अन् वाहनधारक यामुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. पहाटेच्या वेळी मॉर्निग वॉकला जाणार्या ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार रोजच घडत आहेत. तसेच, बिल्डिंग किंवा घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी वाहनांच्या सीट फाडण्याचे सत्रही या कुत्र्यांनी मांडले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नुकसान होत असून, हा मानसिक आणि शारीरिक त्रास जनतेने नक्की किती दिवस सहन करायचा? असा संतप्त सवाल या निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
सध्या शहरामध्ये चांगल्या प्रकारे विकासकामे सुरू आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु, विकास होत असताना जनतेच्या जिवाचे रक्षण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील आश्रयगृह उभारण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून शहरात आश्रयगृह उभारावे, अशी आग्रही मागणी अॅड. सायली दुभाषी यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी झिरांगवाडी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.