सावंतवाडी, दि. ८ जुलै
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या विजेच्या गंभीर समस्येबाबत भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील वीज समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, सावंतवाडी तालुक्यातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात विजेचा मोठ्या प्रमाणावर खेळखंडोबा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या. “विजेच्या समस्येवर वेळीच योग्य त्या उपाययोजना करा, अन्यथा नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल,” असा इशारा यावेळी भाजप नेत्यांनी प्रशासनाला दिला.
या बैठकीत तालुक्यातील अनेक गावांमध्ये वायरमन नसल्याची गंभीर बाबही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ज्या गावांमध्ये वायरमनची पदे रिक्त आहेत, तिथे तातडीने वायरमन उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ही बैठक जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, माजी सभापती पंकज पेडणेकर, पंचायत समिती सदस्या, कास गावचे सरपंच प्रवीण पंडित, सांगेलीचे सरपंच लवू भिंगारे, गेळेचे सरपंच सागर ढोकरे, चौकुळचे सरपंच गुलाब गावडे, शंकर सावंत, गणेशप्रसाद पेडणेकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी तालुक्यातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.