नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाची हालचाल; तुंबलेल्या गटारांच्या साफसफाईचे काम सुरू.
सावंतवाडी, दि. २४ जून
सावंतवाडी शहरातील प्रमुख मार्गावरील गटारांची वेळेत साफसफाई न झाल्याने, पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी गटारे तुंबून रस्त्यावर पाणी साचले होते. या ढिसाळ कारभारावर संतप्त होत, “गटारांची तात्काळ साफसफाई झाली नाही तर मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये चिखल ओतणार,” असा आक्रमक इशारा नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर पालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली असून शहरातील संचयनी परिसरातील गटार साफसफाईच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे.

शहरात पहिल्याच पावसाने पालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनाचे वाभाडे काढले. अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर आज पालिकेने संचयनी परिसर, पई गिरण बाजूचे गटार तसेच साई मंदिर परिसरातील गटारांची साफसफाई हाती घेतली आहे.
याबाबत माहिती देताना नगरसेवक देव्या सूर्याजी म्हणाले की, “शहरात केवळ वरवरची सफाई न करता व्यापक स्वरूपात ‘गटार नाले स्वच्छता अभियान’ राबवण्याची खरी गरज आहे.” पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पालिकेने सर्वच भागांतील नाले आणि गटारे तत्परतेने साफ करावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.