सावंतवाडी दि.८ जुलै
ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या अकरा रक्तवीरांनी वादळ-पावसाची पर्वा न करता एकाच दिवशी तीन रुग्णांना रक्तदान करून जीवनदान दिले. बांबोळी (गोवा) येथील जीएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या तीन रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने रक्ताची गरज निर्माण झाली होती.
सोमवार दि.६ जुलै रोजी जीएमसी हॉस्पिटल, बांबोळी येथे मिलिंद सावंत आणि दत्ताराम मेस्त्री या दोन रुग्णांवर बायपास शस्त्रक्रिया, तर गायत्री कदम या रुग्णावर फ्रॅक्चरच्या हाडाची शस्त्रक्रिया होणार होती. या तिन्ही रुग्णांना एकाच वेळी तातडीने फ्रेश रक्ताची आवश्यकता होती. ही माहिती मिळताच ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे रक्तदाते विनय परब, सुधीर मातोंडकर, अनिकेत सावंत, रामचंद्र भालेकर, सचिन परब, रमेश गावडे, प्रशांत मेस्त्री, नितेश सावंत, अमित परब, मयूर सुभेदार आणि प्रतिक निर्गुण यांनी मुसळधार पावसातही बांबोळी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. या अकरा रक्तदात्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांमधील ३ अशा एकूण १४ जणांनी रक्तदान करून तिन्ही रुग्णांचे प्राण वाचवण्याचे मोलाचे कार्य केले.
या सर्व रक्तदात्यांना एकत्रित करून बांबोळी रक्तपेढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंगेश सुभेदार, प्रशांत मेस्त्री, सुभाष परब, राहुल प्रभू, नामदेव कदम, नितीन तळवडेकर, देवेश परब, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सचिव बाबली गवंडे आणि इतर रक्तमित्रांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी कौतुक केले आहे. संकटसमयी तातडीने रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल तिन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी संस्थेचे आभार मानले आहेत.