सिंधुदुर्ग ,दि.१५ जून
पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित सिंधुदुर्गच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला. या मोहिमेद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. राणे यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. वृक्षलागवड हा केवळ एक औपचारिक उपक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन, संवर्धन आणि जगवणूक यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणे आणि उपलब्ध शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाणार आहे.