कणकवली,दि.२४ जून
सिंधुदुर्गात मायनिंग, औष्णिक ऊर्जा प्रकल्प यासारखे विनाशकारी प्रकल्प लादले जात आहे. या प्रकल्पांतून सत्तेत असलेले राणे कुटुंबीय स्वत:चा अर्थपूर्ण फायदा करून घेत आहे. सिंधुदुर्गात होणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांमुळे निसर्ग ऱ्हासाबाबत सत्ताधाऱ्यांना देणे घेणे नाही. विनाशकारी प्रकल्पांना जनतेचा विरोध आहे. या प्रकल्पांविरोधात सिंधुदुर्गावासीयांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे प्रकल्प होण्यासाठी सत्ताधारी आग्रही आहेत. मात्र, ठाकरे शिवसेना हे होऊ होऊ देणार नाहीत, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख डी. डी. देसाई यांनी सिंधुदुर्ग जिल्हा विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यांच्या जाहिरातीचे अनुकरण सत्ताधाऱ्यांनी केले असून जिल्ह््यातील जमिनी परप्रांतियांनी विकण्याचे काम सुरु केली आहे.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते.
वेंगुर्ले, मालवण, देवगड यासह अन्य तालुक्यातील जमिनी परप्रांतियांना विकण्याचे कामे सत्ताधारी मंडळी करीत आहे. परप्रांतियांनी जमिनी खरेदी करण्यासाठी एका सहकारी बँकद्वारे कर्ज देण्याचे काम सदराधाऱ्यांकडून केले जात आहे. सिंधुदुर्ग निसर्गसंपन्न जिल्हा आहे. या जिल्ह््यात मायनिंग, औष्णिक ऊर्जा यासारखे प्रकल्प लादले जात आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील आजगावात मायनिंग प्रकल्प सुरू करून जिदाल कंपनीला रान मोकळे करून दिले जात आहे. कोकणवासीयांचा विनाशकारी प्रकल्पांना विरोध आहे. या प्रकल्पांच्याविरोधात कोकणवासीयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांचा भूमिकेला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे उपरकर म्हणाले.
आजगाव येथील मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. हा विरोध पालकमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील मंदिरात जावून ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध असल्यास हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या भूमिकेवर पालकमंत्र्यांनी शेवटपर्यंत ठाम राहावे, असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला. ज्या प्रकल्पांमध्ये आर्थिक फायदा आहे, त्या प्रकल्पांतून पालकमंत्री स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्यात माहीर आहे, अशी टीकाही त्यांनी केली