मालवण,दि.२८ जुलै
संवाद हरवल्यास भाषा संपते, भाषा संपल्यास शिक्षण संपते, शिक्षण संपल्यास संस्कृती संपते आणि संस्कृती संपल्यास देश संपतो. त्यामुळे बोलीभाषेतून सुसंवाद साधणे आणि संवादाची परंपरा जपणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांचे ज्ञान नसून मुलांमधील सुप्त कला, सर्जनशीलता आणि संस्कारांचा विकास होय, असे प्रतिपादन साहित्यिक अजय कांडर यांनी केले.
धी आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अजय कांडर हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिराशी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे यांनी केले. शालेय समितीचे अध्यक्ष जे. एम. फर्नांडिस यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
यावेळी विविध शाखांतील आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, आचरा येथून रुद्र संजय जाधव व सई अंकुशराव घुटुकडे, नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम येथून तेजस विश्वास पेडणेकर व रंजिता राजेंद्रप्रसाद नाडकर्णी, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथून प्रथमेश राजेंद्र पुजारे व कस्तुरी नितीन परुळेकर, तर बी.एम.एस. व कॉमर्स वरिष्ठ महाविद्यालय येथून भूषण निलेश नाईक व दर्शना सुनील परब यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी साहित्यिक अजय कांडर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच न्यू इंग्लिश स्कूलच्या उपमुख्याध्यापिका मधुरा महेश माणगावकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशालेचे माजी विद्यार्थी तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. सन २०२५–२६ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मुंबई कमिटीचे कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांनी संस्थेची दैदीप्यमान परंपरा व भावी ध्येयधोरणे मांडली. सूत्रसंचालन अनघा कदम यांनी केले, तर आभार इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी मानले.
यावेळी मुंबई कमिटीचे उपकार्याध्यक्ष इकबाल काझी, सचिव ॲड. सुभाष आचरेकर, कोषाध्यक्ष मंगेश आचरेकर, इंग्लिश मीडियम शालेय समितीचे अध्यक्ष निलेश सरजोशी, बी.एम.एस. व कॉमर्स वरिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष संजय मिराशी, तंत्र व कौशल्य विकास अध्यक्ष रघुनाथ पाटील, बाबाजी भिसळे, अजित आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, प्राचार्य नितेश सारंग, सुरेश ठाकूर, अशोक कांबळी, तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.